Tuesday, 9 September 2025

.......ती प्रीत तू मागू नको

 


आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रिम वाटतो. वा. रा. कांत यांनी ज्या अलवार मनाने, संवेदनशीलतेने, नाजूक -साजूक शब्दांनी भावगीते लिहिलेली आहेत,  त्यांचा आस्वाद घेताना तर 'पुण्यतिथी' हा शब्द तर मला फारच जड वाटायलालागतो.  असो, वा. रा. कान्ताना आठवूयात आणि त्या सुरेख , सुरेल आठवणीत हरवूयात, एवढेच या निमित्ताने मी म्हणेल.  वा. रा. कांत आपल्या नांदेडचे. त्यांचा जन्म आणि प्राथमिक , माध्यमिक शिक्षण तिथलेच. पुढचे इंटरपर्यंतचे शिक्षण मात्र हैद्राबाद येथे झाले. पुढे सरकारच्या आकाशवाणी केंद्रात मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. १९७० साली मुंबईच्या आकाशवाणी केंद्रावरून ते निवृत्त झाले. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी 'विहंगमाला' या  नियतकालिकाचे संपादन देखील केलेले आहे. १९३० ते  १९८८ या काळात त्यांचेजवळपास १० काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांची भावगीते सुधीर फडके यांच्या आर्त आणि गोड गळ्यानेअजरामर केलेली आहेत. त्यांच्या प्रदीर्घ वाड्मयसेवेसाठी महाराष्ट्र  शासनाने त्यांना पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. इतका श्रेष्ठ साहित्यिक अभ्यासक्रमात मात्र क्वचितच सापडतो. आज वा.रा. कांतांना आठवताना मला आठवते त्यांची ती कविता, 'आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको' कवी वा. रा. कांत यांनी इतक्या नजाकतीने  प्रेमाला या कवितेतून व्यक्त केलेलं आहे की, खरोखर  ही कविता उकलण्याला घ्यावी, तिच्याबद्दल काही लिहावं याच्यासाठी मन धजावत नाही. एखादी  गुलाबाची नाजूक कळी नुकतीच फुललेली असावी आणि आपण तिच्या पाकळ्या मोजाव्यात; अशी काहीशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. त्या पाकळ्यांना स्पर्श करताना त्यांचा जो मऊ लुसलुशीतपणा, ताजेपणा त्यांचा गंध आपल्या मनभर पसरत जातो आणि नकळत अंग शहारतं, तशी अवस्था ही कविता वाचून आणि सुधीर फडके यांच्या गळ्यातून ऐकताना होऊन जाते. हे जे वाचकाचं, श्रोत्याचं, रसिकाचं भावविभोर होणं आहे ; हे जेव्हा कवीला साधतं त्यावेळेला त्याची कविता काय उंचीवर गेलेली असते, याची कल्पना आपण खरोखर करू शकत नाही. एक अप्रतिम असा कलात्मक आविष्कार वा.रा.कांत यांच्या या काव्यातून आपल्याला अनुभवायला मिळतो. ही कविता वाचत जाताना, हे गाणं ऐकताना आपल्याला लक्षात येतं,  "अगदी सुरुवातीचं, 'नवथर' असं प्रेम या कवितेतून व्यक्त झालेलं आहे. कळी फुलताना, मुलं वयात येताना प्रेमाची जी नाजूक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि आपल्या प्रेयसी सोबत, प्रियकरा सोबत या सुंदर भावनेचा जो पहिला अनुभव ते घेतात त्या पहिल्या अनुभवाचं शब्दीकरण किंवा पहिल्या अनुभवाला शब्दात पकडण्याचं विलक्षण कौशल्य कवीने दाखवलेलं आहे. सांजवेळी चाफ्याकळीचे 'चुटपुटीचे भेटणे'; पानजाळीतून झिरपणारे 'बावरेसे चांदणे'; या प्रतिमांमधून हे नजाकतीने व्यक्त होतं.

तिनं नि:श्वास टाकताच 'पाकळ्यांचे शब्द' व्हावेत आणि 'देहाची सतार' व्हावी ही कल्पना तर  अफलातूनच ! 

पण या कवितेची मेख इथेच आहे. कवी कवितेच्या सुरुवातीला सांगतोय, आपल्या प्रेयसीची कुठेतरी समजूत घालतो आहे, 'पूर्वीची प्रीत तू मागू नकोस', कालच्या फुलांचे शब्द, हळव्या क्षणातल्या चांदण्यांचे स्पर्श आणि देह सतारीचे गीत तू मागू नकोस. कधीही भुरळ घालणारं, हवंस वाटणारं, मोहात पाडणारं, आकर्षित करून घेणारं हे प्रेयस कवी का नाकारतो आहे ? आयुष्याच्या अशा कोणत्या वळणावरून तो या मधाळ आठवणींकडे पाहतो आहे ? कविता पुढे वाचत असताना अगदी सहजच जाणवतं संसारातली सुखदुःख भोगून झाल्यानंतर, जगाच्या व्यवहाराचे टक्के टोणपे खाल्ल्यावर  एक आलेलं जे वैराग्य आहे, जीवनाबाबतची उदासीनता नाही म्हणता येणार पण डोळ्यातून आसवं न गाळता पचवलेले आयुष्याचे घाव आणि मग त्या सुखाचं झालेलं मीठ आयुष्याची लज्जत वाढवत आहे; अशा एका वळणावरती ते आहेत. अगदी सहजच 'भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले', ही  मनाची स्थिती झालेली आहे, हे सहजतेने लक्षात येते . आणि मग 'तो मोत्यांचा चारा आता मागू नको' अशी आपल्या हंसिणीला, प्रेयसीला कुठेतरी विनंती होते. 

काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का? हा कवीचा प्रश्न रसिकाच्या काळजाला हात घालून जातो. मुळामध्ये बोलण्याची जी प्रक्रिया घडते, ती प्रक्रिया उच्छ्वास टाकताना अर्थात माणूस श्वास सोडत असताना. मात्र त्या श्वासभराने आठवांचं ते शीतल, दुधाळ चांदणं ढवळेल का, हा प्रश्न कवीला सतावत आहे; आणि कदाचित तो मौन स्वीकारण्याकडे झुकतो आहे. एकदा उमलून , फुलून सर्वस्व अर्पण केलेल्या आणि परिस्थितीनं अकाली कोमेजलेल्या या फुलाला प्रश्न पडला आहे, आता पुन्हा फुलण्याची संधी आहे मात्र ते 'फुलणं' या फुलाला सोसवेल का ? कारण आता वय बदललेलं आहे. आयुष्याच्या सांजवेळेकडे आपण झुकत चाललेलो आहोत, मग आता फुलावं का ? कदाचित त्याचा सद्सदविवेक हे फुलणं नाकारतो. आणि बिनदिक्तपणे तो आपल्या प्रेयसीला सांगतो -

नीत् नवी मरणें मराया जन्म तूं मागू नको.

पण मला वाटतं, परिस्थितीने हताश झालेल्या, व्यवस्थेने होरपळलेल्या,या समाजात राहून वाढणाऱ्या, स्वतःला घडवणाऱ्या माणसानं मुळातच 'प्रेम' ही माणसाला अमर करणारी गोष्ट आहे, प्रेम संजीवक आहे हे विसरू नये, आणि प्रेमाला नाकारू नये. फक्त आवश्यकता असते, ते प्रेम निखळ, निर्मळ आणि नितळ असण्याची ! मग सहजच म्हणता येतं - 

ना उम्र की सीमा हो 

ना देश का हो बंधन 

जब प्यार करे कोई 

तो देखे केवल मन

 असं कोणाला म्हणता येतं? काय हे फक्त गाण्यात आणि चित्रपटातच असू शकतं की वास्तवातही घडू शकतं? वा. रा. कांतांची ही कविता विचारांच्या अशा अनेक दिशा मला देऊन जाते. आणि कदाचित एका अशा उत्तरापर्यंत पोहोचवते, जिथे समाजाची मानसझेप जाणं अत्यावश्यक आहे...

त्या नत्याला नसते नाव 

त्या जीवांना नसतो गाव

तेथ केवळ मधुर भाव !


वृंदा आशय


   

Saturday, 6 September 2025

एक पत्र विसर्जित्या बाप्पास.....

 




प्रिय गणेशा,   

तुझ्या सहवासात १० दिवस किती पटकन गेले रे! आला आला, बसला म्हणेस्तोवर विसर्जनाचीही वेळ आली की! किती काय काय घडलं या १० दिवसात. माझ्यासाठी तर खूप काही....तू येण्याच्या आधीपासूनच असे काही पडघम वाजू लागले की बघता सोय नाही. तुझ्याशिवाय थाराच राहिला नाही रे मला. कधीही न बोलणारी मी अनेकांशी बोलले. ‘दुर्लक्ष करा’ याशिवाय दुसरे उत्तरच नव्हते कोणाकडे. जिथे अधिक लक्ष द्यायला पाहिजे, तिथे दुर्लक्ष! हे माझ्या गणितात बसणारे नव्हते... आणि कदाचित तुझ्याही....म्हणून तू माझ्या कवितेतून सांगत आलास -

अवमानिली जाता माता

कृद्ध  होतो बुद्धिदाता

म्हणे .....

कृष्ण रुपात प्रकटेल आता !

तू माझ्यासाठी धावून आलास, कृद्ध होऊन घेतलंस कृष्णरूप आणि सिद्ध केलंस आजही जागृत आहेस म्हणून! आजही द्रौपदीचं वस्त्रहरण होताना लज्जारक्षण करणारा तूच, याची ग्वाही तू दिलीस. काळाला तू तुझा रारा पुन्हा एकदा दाखवून दिलास. तुला प्रार्थना एकच आहे; आलास कृष्णरुपात जाऊ मात्र कृष्णासारखा नकोस. स्वकुळात यादवी माजू देऊ नको. तुला प्रार्थना आहे, तू विसर्जन कर माणसाच्या अहंकाराचं! खरं म्हणजे तू इतका शस्त्रसज्ज आलेला होतास की माणसाच्या अहंकाराला नेस्तनाबूत करून त्याला धडा शिकवण, तुला कधीच अशक्य नव्हत आणि नाही. मात्र तू देव आहेस आणि म्हणून देवानं माणसासारखं वागू नये. देवानं सूड उगवू नये. देवानं फक्त धडा द्यावा माणसाला धड राहता यावं यासाठी!  

देवा, म्हणूनतुला प्रार्थना आहे तू विसर्जन कर साहित्य, संगीत, शिक्षण या क्षेत्रातल्या माणसांच्या अहंकाराचं! सामान्य माणसाचा प्रश्न नाही रे. त्याची विलक्षण श्रद्धा असते तुझ्यावर. आजही तुला दंडवत घालत, तुला नवस बोलत, तुझ्याकडे तो धावत येत असतो. सातत्याने प्रश्न निर्माण होतो तो फक्त बुद्धिजीवीचा!

सांग त्या बुद्धिजीवीना एका महाबुद्धिजीवीने - लोकमान्य टिळकांनी तुझी प्रस्थापना केली, शिवजयंती आणि गणेशोत्सवासारखे सार्वजनिक उत्सव निर्माण केले तेच मुळी संघटनासाठी. हे संघटनाचे सूत्र लक्षात ठेवून विघटन टाळावयाला शिकव लोकांना. सांग त्यांना त्यांची स्पर्धा स्वतःशी, सभोवतालाशी नाही रे. फार मोठी स्पर्धा आहे इथे आज. कठीण आव्हाने आहेत. माणुसकी पणाला लागलेली आहे. पणाला लागलेली माणुसकी सांभाळणं हे शिक्षण, साहित्य, संगीत या क्षेत्रात वावरणाऱ्या साऱ्यांचे काम आहे. आद्य कर्तव्य आहे. ईश्वरा, त्या कर्तव्याची जाणीव त्यांना करून दे. कधी वाटतं तू यांना आठवण दे तुम्ही एका कुटुंबातले आहात. पण आज दुर्दैवाने कुटुंबातच इतके मतभेद निर्माण व्हायला लागले की कुटुंब ही संज्ञा प्रतीकासारखी, प्रतिमेसारखी वापरावी की नाही हा प्रश्न पडावा! ‘मतभेद’ आणि ‘मनभेद’ हे समानार्थी शब्द झालेत रे! हे परमेशा, नको करूस असं. या कुटुंबाला तू सुरक्षित ठेव. कारण तुझा देव्हारा त्या कुटुंबात आहे. तो देव्हारा सुरक्षित राहिला पाहिजे. भारतीय संस्कृतीचा मंत्र आहे आत्मविसर्जनाचा. हे आत्मविसर्जन अहंकाराच्या बाबतीत असलंच पाहिजे. स्वाभिमान जरूर जोपासावा पण तो माणसे, नाती तोडण्याइतक्या टोकाला जेव्हा जातो ना त्या वेळेला तो घातकच असतो.

हे बुधिदात्या तुझ्या विसर्जनासर्जन आहे. तुझ्या निरोपारोप आहे. तुला प्रार्थना करते जाता जाता तू सर्जन कर सदविचारांचं, तू सर्जन कर एकोप्याचं, तू सर्जन कर नव्यानं शिकण्याचं, तू सर्जन कर कुतूहलाच! हे परमेशा तुला प्रार्थना करते तू रोप लाव नाविन्याचे, तू रोप लाव अनुकूलतेचे, तू रोप लाव युवांच्या नव्या दिशांचं! हे परमेशा, तू आशीष दे! तू आशिष देतच असतोस. काय सांगू तुला, कलियुग आहे रे हे! कधी कधी संस्था एखाद्या व्यक्तीसारखी  वागायला लागते. राग-लोभात, मद-मोहात अडकते. दूषित बुद्धीने आणि कलुषित मनाने निर्णय घेतले जातात आणि मग तू निवडतोस अशा व्यक्तीच्या हातून उद्घाटित हो, अशा व्यक्तीच्या हातून प्रकाशित होणं, ज्यानं आयुष्यभर एखाद्या संस्थेसारखं काम केलेले आहे, तुला सलाम!

कधी नव्हे तो आज नंदादीप पहाटे विझलेला होता रे! काय, तुला सांगायचं होतं का, आता मी जातोय, माऊली यायला वेळ आहे अजून. थोडा काळ तरी तुमचं तुम्ही सांभाळा आणि त्यासाठी पूर्वजांना शरण जात त्यांचे अनुभव विचारा! कदाचित हाच तुझा संदेश असेल.. कदाचित...!

 

वृंदा आशय

Friday, 22 August 2025

बुगु....बुगु...

 


 








महाविद्यालयातून परतत होते. पावसाचा हलकासा शिडकावा सुरू होता. बाजार प्लास्टर ऑफ पॅरीसच्या आणि मातीच्या बैलांनी, गाय-वासरांनी सजलेला होता. मातीचा तो हलकासा गंध मला थेट माझ्या गावाकडे घेऊन गेला. हातवणला घराच्या मागच्या दारी गेले की गोठा ऐकू येई. गाई बैलांचे हंबरणे, गळ्यातल्या घुंगुरमाळाचा आवाज, वासरांनी गायींना लुचणे, दाव्याला हिसके देणे, वासरांचे हुंदडणे सार काही काना-मनात साठवून घेत होतो. बैलगाडीत फेरफटका मारणे हा तर आवडीचा कार्यक्रम असे.  त्यावेळी बैलगाडीची होणारी खडखड-धडधड, मध्येच झाडाची फांदी डोक्याला लागेल म्हणून खाली वाकून जाणे, बैलगाडी उतारावरून जाताना पोटात येणारा गोळा... सारेसे सहज डोळ्यासमोर येते.

आमचं बालपण तसं समृद्धच. आम्ही सशाशी खेळलेलो, हरीण पालेलं, गाई -बैलांमध्ये वावरलेलो, शेळ्या बकऱ्याना चुचकारलेले, तबेल्यातल्या घोड्याला कुतूहलाने न्याहाळलेले, गुऱ्हाळ अनुभवलेले आणि त्यामुळे शेतीशी-मातीशी आमचे एक नाते जडलेले. शेतीत राबणारा बैल खूप वेगवेगळ्या गोष्टींची आठवण देतो. मला आठवतं आमचे कै. महामहोपाध्याय ब्रह्मानंदजी देशपांडे सर नेहमी म्हणायचे अरे, बैल हे बुद्धी’चे आणि शक्ती’चे प्रतीक आहे. आपण एखाद्या माणसाला जेव्हा बैल म्हणतो ना त्या वेळेला खरं म्हणजे बैलाचा अपमान करत असतो”.

विद्यार्थीदशेत शिकलेली कवी विठ्ठल वाघ यांची बैल ही कविता मनावर कोरली गेलेली आहे.

बैल आभाळाची कृपा | बैल धरतीचा जप ||

काळ्या मातीची पुण्याई | बैल फळलेले तप ||

बैल घामाची प्रतिमा | बैल श्रमाचे प्रतीक ||

बैल माझ्या शिवारात | काढी हिरवे स्वस्तिक ||

बैलाच्या कष्टाचं, त्याच्या अस्तित्वाचं जे मांगल्यपूर्ण वर्णन त्यांनी केलेले आहे; त्यामुळे हे काव्य बैलाविषयीची कृतज्ञता आपल्या मनामध्ये जागवून जाते. बैल माझ्या शिवाराचे ‘हिरवे स्वस्तिक आहे ही कल्पना माणसाच्या संवेदनशीलतेची, समृद्धतेची, संपन्नतेची ग्वाही देणारी आहे. बैलाच्या कष्टातून ‘सृजन’ घडत आणि सृजनाच्या या संस्कारातून ‘सुजन’ घडतात. (शेवटी अन्न-पाण्याच्या संस्कारातूनच माणूस घडतोना.) मला हे ‘श्रमप्रतिष्ठे’चे फार मोठे तत्त्व वाटते. शरीराने कष्ट केले म्हणजे मन आपोआप निर्मळ होत जाते. निर्मळ मनात विचारांची शुद्ध बीज पडायला लागतात. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, ही शतकानुशतकांची ग्वाही तुकोबांनी देऊन ठेवलेली आहे. मात्र तिकडे आम्ही दुर्लक्ष करतो म्हणून आजही ‘सुजाण’तेचा अभाव फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो.   

खर तर भारतीयांचे सारे जीवन निसर्गाशी नाते सांगणारे आहे. इथले दैनंदिन जीवन आणि उत्सव सृष्टीचक्राशी संबंधित आहेत. या सृष्टीच्या नियमांना आम्ही ‘धर्म’ म्हणतो. ‘धृ धारयति इति धर्म:’, ही श्रद्धा बाळगत समाज जीवनाची धारणा करतो. इथल्या मातीचा रंग काळा; इथले देवही काळया रंगाचे. आमचा विठ्ठल काळा, आमचे राम-कृष्ण सावळे. काळे ढग पाऊस घेऊन येतात. जमिनीला पेरते करतात. सृजनाचा उत्सव सारे हिरवंगार करतो. माणसाला आत्मनिर्भर करतो.

ही आत्मनिर्भरता कष्टातूनच फुलते. कोणत्याही योजनांमध्ये कष्टाची ताकद नाही. त्यामुळे मुळाशी नाते सांगत आमच्या कष्टकऱ्यांचा रंगही काळाच! कृष्णवर्णाची आणि ‘कृष्ण’मनाची ही माणसे धवल चारित्र्याची असतात. आपुलकी, जिव्हाळा, स्नेह त्यांच्या व्यक्तित्वातून सातत्याने पाझरत असतो. कष्टांशी प्रामाणिक राहात सामान्य माणसाचे ‘प्रमाण’ ते घडवत असतात. अंगण-ओसरीपासून माजघरापर्यंत वस्तूंचा किंवा प्रत्यक्ष वास्तुचाही अभाव असला तरी त्यांच्या मनातला भाव आणि हाताचे कष्ट देव शोधण्याचा आणि देव घडवण्याचा प्रयत्न करत राहतात. या मार्गावर अनेक खाच-खळग्याना, संघर्षाना, कसोट्यांना त्यांना सामोरे जावे लागते. अगदी सत्त्वपरीक्षा म्हणावी अशा घटना-प्रसंगांना प्रत्येकाला कधी ना कधी तोंड द्यावेच लागते. या सत्त्वपरीक्षेला जे पुरून उरतात ते उजळून निघतात. उजळून निघालेले ताठ मानेने जगत राहतात. त्यामुळेच कष्टकरी स्वाभिमानाने जगतात. ज्याना आपण असंघटित क्षेत्रातील कष्टकरी लोक म्हणून ओळखतो ते अत्यंत स्वाभिमानाने जगताना, वेळप्रसंगी स्वत:च्या अटींवर काम करताना दिसतात. अर्थातच त्यांच्या जीवनाचा दर्जा आणि प्रश्न निराळ्या स्वरूपाचे असतात.   

त्या तुलनेने संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार वर्गाची स्थिती निराळी आहे. जिथे संघटना आहे, तिची विशिष्ट उद्दिष्टये ठरलेली आहेत, तिथे लोक आपले हितसंबंध गटाच्या माध्यमातून जपत जगतात. बुद्धिजीवी वर्गाची परिस्थिति मात्र फार निराळी आहे. प्रत्येकाचे मत निराळे आणि त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे ते कधी टोकाला जाईल याचा नेम नसतो. इथे एकसंघ गटाने काम होण्याऐवजी एकटेपणाने किंवा छोट्या छोट्या गटातून काम होते. परिणामी प्रत्येकाचा स्वतंत्र असा सवतासुभा दिसायला लागतो. जेव्हा या सर्वांना हाताळणारी व्यवस्थापक मंडळी स्वत:चे बलीष्ठपण सिद्ध करू इच्छितात तेव्हा ते आपल्या ‘हो’ मध्ये ‘हो’ मिळवणारी, आपली री ओढणारी माणसे शोधायला लागतात, जवळ करतात.             

हा विचार मनात येताच मन पुन्हा लहानपणात गेले. गावातून शहरात राहायला आलेल्या आम्हाला गोठा दुरापास्त झालेला होता. पोळ्याच्या निमित्ताने कोणी सजवलेला बैल दारात आणेल का, याची वाट आम्ही पाहत होतो. अशी वाट पाहतानाच एकदा एकाने फार मोठा बैल आणला. मी तर दचकून मागेच सरकले. वडील म्हणाले, “अग घाबरू नको. हा नंदीबैल आहे”. अच्छा म्हणजे भोलानाथवाला का ? ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का’, हे गाणे तोवर मनात सुरु झाले होते. तोवर मागून दादा चिडवत आला नंदीबैल बुगु ..बुगु..  

पाऊस पडेल का, शेतात पीक येईल का असे प्रश्न नंदीबैलाला विचारले की तो ‘बुगु’ बुगु’ असे उत्तर देतो. अर्थात ही एक होकारात्मक, आशादायी अशा प्रकारची संज्ञा आपल्याला वापरलेली दिसून येते. नंदीबैलाला ते शोभते पण माणसाचा ज्यावेळेला नंदीबैल होतो आणि तो केवळ हो’, हो करत राहतो, तेव्हा समाजाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

माणसाच्या बाबतीत ‘बुगु बुगु’ संस्कृती त्याला स्वतंत्रपणे विचार करण्यापासूनच परावृत्त करते. आपलं काही वेगळे मत असू शकते आणि आपण ते मांडले पाहिजे याची जाणीव खरे तर प्रगतीच्या दिशेने नेणारी आहे. मतभेद हे एखाद्या संकल्पनेचे, कार्यपद्धतीचे, प्रश्नाचे विविध पैलू समोर आणणारे असतात. संबंधित गोष्टीचा सर्वांगीण विचार करण्यास ते प्रवृत्त करतात. अर्थात जेव्हा आपण त्या बाबीकडे निखळ व निरामय पद्धतीने पाहतो, तिचा विचार करतो तेव्हाच हे शक्य होते. ज्यावेळेला आपल्या अन्य इंटरेस्टची सरमिसळ आपण त्या गोष्टीत करतो तिथे गडबड होण्यास सुरुवात होते. साधेसरळ आयुष्य गुंतागुंतीचे व्हायला लागते. ही गुंतागुंत एखादी सुरेख रचना निर्माण करणार असेल, विधायक कार्य करणार असेल तर गोष्ट निराळी. मात्र हा गुंता केवळ अडथळा वाढवणारा आणि मनात गाठी निर्माण करणारा असेल तर तो तुटूनच सुटू शकतो. हा गुंता असतो व्यक्तीव्यक्तीच्या आंतरसंबंधातला, भावबंधातला, कार्यशैलीतला. खरे म्हणजे बहुतांश वेळा आपली उद्दिष्टे समान असतात. तिथे कोणत्या मार्गाने पोहोचायचे याबाबत वाद असतात. थोडी संवेदनशीलता आणि सहनशीलता बाळगली; प्रत्येकाला मत आणि मन असते याचे भान आणि जाण बाळगली तर संवादातून प्रश्न सुटू शकतात. मात्र सभ्यतेच्या, उदात्ततेच्या बुरख्याखाली स्वत:चा अहंकारच आपण कुरवाळत राहिलो आणि आपल्याकडे सत्ता, पैसा किंवा तत्सम गोष्टी आहेत म्हणून इतरांकडूनही हा अहम जोपासण्याचा प्रयत्न करत राहिलो तर जीवन गढूळ व्हायला लागते. गाळ साचत जातो. त्यात माणूस रुतत जातो. कार्यहानी घडत राहते.         

त्या वेळेला लक्षात येते शिक्षणाने माणसाला विचार करायला शिकवलेले आहे. मात्र बऱ्याच वेळेला परिस्थितीशरणता स्वीकारत माणसाने तर्कशुद्धतेचा बळी देऊन अगदी मुक्तपणे नंदीपण स्वीकारलेलं असतं. दुर्दैवाने हे राजकारणाच्या, समाजकारणाच्या, कलेच्या, अध्यात्माच्या, खेळाच्या अशा सगळ्याच क्षेत्रात प्रत्ययाला येते आहे. ते शिक्षणाच्या क्षेत्रातही सुरु होते त्यावेळी मानवी जीवनात धोक्याची घंटा वाजत असते. वास्तविक पाहता शिक्षणामध्ये सर्व क्षेत्रातल्या समस्या सोडवण्याची ताकद असावी. मात्र अशा परिस्थितीमुळे शिक्षणक्षेत्रच एक मोठी समस्या म्हणून आपल्यासमोर उभे राहते. सर्वसाधारणपणे ‘बुगु बुगु करणाऱ्यांना चुचकारले जाते आणि न करणा-यांची उपेक्षा होते. अर्थात हे प्रश्न प्रत्येक काळात आणि प्रत्येक क्षेत्रात निर्माण होतात. संत रामदासांना देखील उपेक्षू नको गुणवंता अनंता’ असे मागणे मागावे लागले. प्रत्येकच काळात कौरव – पांडव प्रवृत्ती असतात. प्रत्येक अर्जुनाला स्वत:तच कृष्ण शोधावा लागतो. तो स्वतंत्र, विधायक, सृजनशील विचारांनी, साधनेनी सापडू शकतो.  

मला वाटतं माणसाच्या आयुष्यात दोन पर्याय असतात नंदी व्हायचं की आनंदी व्हायचं? जो नंदी होतो तो दुसऱ्याची री ओढण्यात आपला आनंद मानतो आणि जो नंदी व्हायचं नाकारतो तो आनंदाच्या संघर्षशील वाटा स्वतंत्रपणे साकारतो. या सृजनात समाजाची 'सुजनता' आणि 'सुजाणता' वाढावी, एवढीच वृषभचरणी प्रार्थना!

 

वृंदा आशय

 

 

 

 

 

 

 

 

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...