Saturday, 28 March 2026

अश्वत्थाची सळसळ !

 


वर विठ्ठल खाली कृष्ण; जे सोडवतील माझा कूटप्रश्न !


        ‌‌.                 •|ॐ |•

                      अश्वत्थाची सळसळ 

माझं बालपण गेलं ते औरंगपुऱ्याच्या अंगणामध्ये. त्या मनमोहक अंगणामध्ये धुणं धुण्याच्या ओट्यावर मनसोक्त बसायचं आणि समोरचा पिंपळ आणि उंबर (माझं ते वय असं होतं की माझ्या दृष्टीने ते महावृक्षच) हे न्याहाळायचे हा माझा छंद. शेजारीच पाण्याचा मोठा हौद होता .त्या पाण्याच्या हौदाच्या काठावर बसून पुस्तक वाचन म्हणजे तर माझ्यासाठी 'अमृतयोग' असे. हे पुस्तक वाचत असतानाच तिथल्या ओट्यावरती खारुताई आणि साळुंक्या बागडत यायच्या. त्यांची जी काही शिवणसाई चाले ती पाहातच माझा अभ्यास व्हायचा. टून टून उड्या मारणारी साळुंकी आणि तिच्या मागे धावणारी खारुताई मोठंच मनोरम दृश्य असे ते.

अंगणामध्ये गुलाबाच्या कुंड्या असायच्या. त्याच्या भोवती चिमण्या चिवचिवत बसायच्या. त्यांना दाणे टाकायचे आणि टिपताना पाहात बसायचे, केवढा तो आनंद! 
अशातच एखादा महाळ्या ( मोठं माकड) झाडावर उडी मारून आलं की मग मात्र आम्हाला पळता भुई थोडी व्हायची. जिन्याच्या दहा पायऱ्या चढताना आम्हाला ब्रह्मांड आठवायचे. कसेबसे घरामध्ये पोहोचून मग दाराच्या फटीतून, खिडकीच्या भोकातून महाळ्याला पाहण्याचा आनंद आम्ही घ्यायचो. "दार उघडू नका गं पोरींनो, येईल महाळया आतमध्ये." हा आईचा आवाज आजही कानामध्ये सहजच उमटतो. मग दुसऱ्या दिवशी ही सगळी गंमत , सुपारी मारुतीच्या दर्शनाला आलेल्या माझ्या दादाला सांगायची आणि तीच गोष्ट पुन्हा जगायची ही गंमत तर खूपच भारी.

..... पिंपळ असा सळसळत राहतो, माझ्या मनामध्ये बालपणापासूनच.
 पिंपळाच झाड कसं 
कुठेही उगवतं 
कुठेही उगवतं म्हणून 
त्याचं कसंही निभावतं 
ही चारोळी कदाचित 'मी माझा' या काव्यसंग्रहातील चंद्रशेखर गोखले यांचीच असावी, ती मला आठवत राहते.
पिंपळाच झाड रस्त्यामध्ये कुठेही दिसलं तरी माझं मन आनंदून जातं. अगदी निराश झालेलं असेल तरीही त्याला एक नवी उभारी येते. मला वाटतं पिंपळाच्या झाडाबरोबर माझं बालपण माझ्या भोवती भिरभिरत असावं. 'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' असं का म्हणलेलं असावं; हे मला त्या त्या क्षणी कळायला लागतं. (लहानपण आणि बालपण यात फरक आहे हे सुज्ञास सांगणे न लगे) या लहानपणामध्ये बालपणीची निरागसता अनुस्यूत असते. ही निरागसता माझ्याजवळ रेंगाळत राहते. त्यातूनच माझं आयुष्य संज्ञाप्रवाही होत जातं.
पिंपळाच्या झाडावर पडणारं ऊन हे तर माझा अगदी वीक पॉईंट म्हणावं असं. हे ऊन पिंपळाच्या झाडाला सोनेरी करून टाकतं. सीतेला जसा सोनेरी मृगाचा मोह पडला होता ना तसा मला या सोनेरी पिंपळाचा मोह होतो. असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि इतक्यात मला रांजणगावच्या गणपती जवळ महावृक्ष म्हणावा असा सोनेरी पिंपळ दिसला. जीव आनंदून गेला. आणि या आनंदापाठोपाठ तिथल्या गजदर्शनाने मात्र मला आठवण दिली - 
  ऐरावत रत्‍न थोर ।
  त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
या गजदर्शनानं मी पुन्हा भानावर आले. गणपती माझा मित्र जिवाचा ज्याला म्हणती पुत्र शिवाचा या लहानपणच्या ओळी पुन्हा एकदा मनामध्ये रेंगाळायला लागल्या. 
आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळेच सण मोठ्या घरी व्हायचे पण  मुलांना आवडतो म्हणून, मुलांना बरं वाटावं म्हणून आमच्या आईनं आमच्या घरी दहा दिवसांचा गणपती बसवायला सुरुवात केली. तेव्हापासून गणपती आमचं सर्वस्व झालं. दहा दिवस 'बाप्पा' आपल्या घरी राहणार या कल्पनेनेच मन हुरळून जायचं. सकाळ संध्याकाळ त्याची होणारी आरती माझ्या मनात आजही पिंगा घालते. मोदकाच्या नैवेद्याभोवती आजही माझं मन फेर धरून नाचतं. हे बाप्पा दहा दिवसांनी आपल्या घरी जायचे तेंव्हा भावूक झालेल्या आईला बघून आम्ही हमसून हमसून रडायचो. तेंव्हापासूनच बाप्पांशी आमचं असं प्रेमाचं नातं. मला अजून एक आठवतं, आमच्या मोठ्या काकांना आम्ही 'बाप्पा' म्हणायचो. ते स्वभावाने अतिशय तापट मात्र 'दिलवर के लिये दिलदार है हम, दुश्मन के लिये तलवार हैं हम' अगदी या वृत्तीचे. ज्या ज्या संस्थांमध्ये त्यांनी काम केलेले आहे, त्यांना आजही त्यांचे नाव काढताच आठवतो तो त्यांचा धाक आणि दरारा! 'कर्तृत्व असावे तर असे'.  तर ज्या ज्या अध्यात्मिक गटातून ते वावरले, त्यांना आठवते त्यांची सात्त्विकता. मग मला आपसूकच वाटते 'व्यक्तित्व असावे तर असे'. त्यांच्या या व्यक्तित्वाचे आणि कर्तृत्वाचे अजोड प्रत्यंतर आम्हाला कौटुंबिक जीवनात येत होते ते संपूर्ण परिवाराला त्यांच्याबद्दल वाटणा-या धाकातून आणि आदरातून. त्यांच्यासाठी आम्ही वापरत असलेल्या 'बाप्पा' या संबोधनाचे आणि गणपती बाप्पाशी असलेल्या माझ्या नात्याचे काही परस्पर संबंध असतील का याचा माझं संशोधक मन आपसूक विचार करू लागतं. त्याचं उत्तर जेव्हा सापडेल तेव्हा सापडेल; एक मात्र मला त्यांच्याकडे पाहून नक्की कळले, 
जया अंगी मोठेपण ।
तया यातना कठीण ॥३॥

आणि कदाचित म्हणूनच माझ्या जीवाला 'लहानपणाचा' सोस असेल. आपण आपल्या आपल्या छोट्याशा जगात सुखी राहावे, असे मला नेहमी वाटते. मात्र आपल्याला जे वाटते ते घडतेच असे मात्र नाही. माझे माझे एक सुंदर जग होते, जिथे मी चिऊताईसारखी बागडत होते, हुंदडत होते, नाचत होते, गात होते. कोणी माझ्याकडे बघते आहे की नाही याच्याशी मला काहीच कर्तव्य नसायचे. कारण मला स्वतःलाच कोणाकडे विनाकारण बघण्याची सवय नाही. मी कामाशिवाय कधी कोणाशी बोलल्याचेही मला आठवत नाही. लोकांना माझी ही सवय हळूहळू 'ताठा' वाटायला लागली. माझ्यादृष्टीने मात्र विनाकारण कोणाच्या कामात नाक खूपसू नये, विनाकारणची औपचारिकता दाखवू नये, उगाचच कोणाचा वेळ घेऊ नये ( मी आमच्या गावाकडे आणि आजोळीही कारणांशिवाय तासन् तास रंगणाऱ्या गप्पा अनुभवलेल्या होत्या. ज्याचे आउटपुट माझ्या दृष्टीने शून्य असायचे.) हे माझे स्वभावपैलू त्यामागे आहेत. त्याचे कोणाला स्पष्टीकरण द्यावे, असेही मला वाटत नाही. 

..... माझ्याकडे माझ्या नकळत कोण बघत होते, आणि कोणाची मला दृष्ट लागली मला माहीत नाही. मात्र दोन वेळा मी अंधाराच्या खोल खाईत ढकलले गेले. माझ्या कुटुंबाच्या साथीने आणि देव कृपेने मी दोन्ही वेळा त्यातून सुखरूप बाहेर पडले. तिसरी वेळ आली तेव्हा आता मी खोल खाईतच गाडली जाणार अशी मला भीती वाटत होती. ...but you are not burried you are planted ही सकारात्मकता कोणीतरी मला दिली आणि संदेश मिळाला 'प्राणवान हो'; संदेशाबरोबरच ठिबक सिंचन झाले. कदाचित मीअंकुरत होते ; वठलेल्या मुळांना कोंब फुटले आणि मन पालवलं. मनाचा तो लुसलूशीत कोवळेपणा मी जपू पाहात होते; मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. चिघळत्या परिस्थितीने पालवी कोमेजली नाही ; उलट बहरत गेली. 'प्रवाहाबरोबर वाहावे' हा सर्वमान्य नियम या बहराने मोडीत काढला. मी स्वतंत्र भारताची एक स्वतंत्र नागरिक आहे; माझी मला मते असू शकतात आणि ती मते ठामपणे व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे ; देशप्रेमाच्या या कौटुंबिक वारशाने डोके वर काढले. जणू काही हैदराबाद मुक्तिसंग्रामात लढलेले माझे आजोबा 'विठ्ठलराव देसाई' माझ्यामध्ये संचारले. स्वातंत्र्याचा पहिला हुंकार कोणालाही बंडच वाटतो आणि मग येन-केन प्रकारेण परिस्थिती थंड करण्याचा प्रयत्न होतो. साम-दाम-दंड-भेद यांचा मुक्त वापर अशावेळी सर्वत्रच होतो. मात्र ही पेटलेली मशाल कशाचेच विझली नाही. हळूहळू सारे जग विरोधात गेले. या मशालीला वाचवण्याचा प्रयत्न करणारे निकालात निघाले. त्यासाठी साक्षी-पुरावे गोळा करणारे साक्षीभावात गेले. मात्र मशाल विझली नाही. कारण ती आता माणसाच्या हातात नव्हती तर देवाच्या मनात होती. 'देव तारी, त्याला कोण मारी' याचे प्रत्यंतर सर्वचजण / सर्व जन घेत आहेत.
        देव माणसासारखा नसतो. तो आयतं काहीतरी तयार करून माणसाच्या हाती देत नाही. तो माणसालाच 'तयार' करतो. म्हणून तर तो विज्ञान - तंत्रज्ञानाच्या पल्याड आहे. अनादी - अनंत आहे. सर्वज्ञ आणि अगम्य आहे. त्याचे यथार्थ वर्णन केवळ 'नेती' हा एकमेव शब्द करू शकतो. त्याचे शास्त्र फार निराळे आहे. माणसाने त्याच्या शास्त्राचे शस्त्र केले की तो अस्त्र काढतो - ज्ञानास्त्र ! ज्याच्यापुढे माहितीचे जग पुठ्ठ्याच्या बंगल्यासारखे क्षणार्धात कोसळते. अशावेळी माझा कोवळा पिंपळ प्रगल्भ होतो. बोधी वृक्षाखाली बसलेले गौतम बुद्ध मला आठवतात.  स्वधर्माकडे नेणारी संत-महंतांची शिकवण एकच आहे आणि कर्मयोग  साधणारा 'स्वधर्म'च ईश्वर आहे; हे मला पटते आणि आठवतात संत तुकारामांच्या अभंगाच्या राहिलेल्या ओव्या -

तुका म्हणे बरवे जाण ।
व्हावे लहानाहून लहान ॥४॥
महापूरे झाडे जाती ।
तेथे लव्हाळ वाचती ॥५॥

आणि गोष्टीवेल्हाळ मुलीसारखी मी माझे 'लव्हाळपण' जपत राहते. वाटेतला भर माध्यान्हीचा सोनेरी पिंपळ अंगभर सळसळतो!

वृंदा आशय 

श्रीकृष्णार्पणमस्तु!




Tuesday, 9 September 2025

.......ती प्रीत तू मागू नको

 


आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रिम वाटतो. वा. रा. कांत यांनी ज्या अलवार मनाने, संवेदनशीलतेने, नाजूक -साजूक शब्दांनी भावगीते लिहिलेली आहेत,  त्यांचा आस्वाद घेताना तर 'पुण्यतिथी' हा शब्द तर मला फारच जड वाटायलालागतो.  असो, वा. रा. कान्ताना आठवूयात आणि त्या सुरेख , सुरेल आठवणीत हरवूयात, एवढेच या निमित्ताने मी म्हणेल.  वा. रा. कांत आपल्या नांदेडचे. त्यांचा जन्म आणि प्राथमिक , माध्यमिक शिक्षण तिथलेच. पुढचे इंटरपर्यंतचे शिक्षण मात्र हैद्राबाद येथे झाले. पुढे सरकारच्या आकाशवाणी केंद्रात मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. १९७० साली मुंबईच्या आकाशवाणी केंद्रावरून ते निवृत्त झाले. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी 'विहंगमाला' या  नियतकालिकाचे संपादन देखील केलेले आहे. १९३० ते  १९८८ या काळात त्यांचेजवळपास १० काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांची भावगीते सुधीर फडके यांच्या आर्त आणि गोड गळ्यानेअजरामर केलेली आहेत. त्यांच्या प्रदीर्घ वाड्मयसेवेसाठी महाराष्ट्र  शासनाने त्यांना पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. इतका श्रेष्ठ साहित्यिक अभ्यासक्रमात मात्र क्वचितच सापडतो. आज वा.रा. कांतांना आठवताना मला आठवते त्यांची ती कविता, 'आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको' कवी वा. रा. कांत यांनी इतक्या नजाकतीने  प्रेमाला या कवितेतून व्यक्त केलेलं आहे की, खरोखर  ही कविता उकलण्याला घ्यावी, तिच्याबद्दल काही लिहावं याच्यासाठी मन धजावत नाही. एखादी  गुलाबाची नाजूक कळी नुकतीच फुललेली असावी आणि आपण तिच्या पाकळ्या मोजाव्यात; अशी काहीशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. त्या पाकळ्यांना स्पर्श करताना त्यांचा जो मऊ लुसलुशीतपणा, ताजेपणा त्यांचा गंध आपल्या मनभर पसरत जातो आणि नकळत अंग शहारतं, तशी अवस्था ही कविता वाचून आणि सुधीर फडके यांच्या गळ्यातून ऐकताना होऊन जाते. हे जे वाचकाचं, श्रोत्याचं, रसिकाचं भावविभोर होणं आहे ; हे जेव्हा कवीला साधतं त्यावेळेला त्याची कविता काय उंचीवर गेलेली असते, याची कल्पना आपण खरोखर करू शकत नाही. एक अप्रतिम असा कलात्मक आविष्कार वा.रा.कांत यांच्या या काव्यातून आपल्याला अनुभवायला मिळतो. ही कविता वाचत जाताना, हे गाणं ऐकताना आपल्याला लक्षात येतं,  "अगदी सुरुवातीचं, 'नवथर' असं प्रेम या कवितेतून व्यक्त झालेलं आहे. कळी फुलताना, मुलं वयात येताना प्रेमाची जी नाजूक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि आपल्या प्रेयसी सोबत, प्रियकरा सोबत या सुंदर भावनेचा जो पहिला अनुभव ते घेतात त्या पहिल्या अनुभवाचं शब्दीकरण किंवा पहिल्या अनुभवाला शब्दात पकडण्याचं विलक्षण कौशल्य कवीने दाखवलेलं आहे. सांजवेळी चाफ्याकळीचे 'चुटपुटीचे भेटणे'; पानजाळीतून झिरपणारे 'बावरेसे चांदणे'; या प्रतिमांमधून हे नजाकतीने व्यक्त होतं.

तिनं नि:श्वास टाकताच 'पाकळ्यांचे शब्द' व्हावेत आणि 'देहाची सतार' व्हावी ही कल्पना तर  अफलातूनच ! 

पण या कवितेची मेख इथेच आहे. कवी कवितेच्या सुरुवातीला सांगतोय, आपल्या प्रेयसीची कुठेतरी समजूत घालतो आहे, 'पूर्वीची प्रीत तू मागू नकोस', कालच्या फुलांचे शब्द, हळव्या क्षणातल्या चांदण्यांचे स्पर्श आणि देह सतारीचे गीत तू मागू नकोस. कधीही भुरळ घालणारं, हवंस वाटणारं, मोहात पाडणारं, आकर्षित करून घेणारं हे प्रेयस कवी का नाकारतो आहे ? आयुष्याच्या अशा कोणत्या वळणावरून तो या मधाळ आठवणींकडे पाहतो आहे ? कविता पुढे वाचत असताना अगदी सहजच जाणवतं संसारातली सुखदुःख भोगून झाल्यानंतर, जगाच्या व्यवहाराचे टक्के टोणपे खाल्ल्यावर  एक आलेलं जे वैराग्य आहे, जीवनाबाबतची उदासीनता नाही म्हणता येणार पण डोळ्यातून आसवं न गाळता पचवलेले आयुष्याचे घाव आणि मग त्या सुखाचं झालेलं मीठ आयुष्याची लज्जत वाढवत आहे; अशा एका वळणावरती ते आहेत. अगदी सहजच 'भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले', ही  मनाची स्थिती झालेली आहे, हे सहजतेने लक्षात येते . आणि मग 'तो मोत्यांचा चारा आता मागू नको' अशी आपल्या हंसिणीला, प्रेयसीला कुठेतरी विनंती होते. 

काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का? हा कवीचा प्रश्न रसिकाच्या काळजाला हात घालून जातो. मुळामध्ये बोलण्याची जी प्रक्रिया घडते, ती प्रक्रिया उच्छ्वास टाकताना अर्थात माणूस श्वास सोडत असताना. मात्र त्या श्वासभराने आठवांचं ते शीतल, दुधाळ चांदणं ढवळेल का, हा प्रश्न कवीला सतावत आहे; आणि कदाचित तो मौन स्वीकारण्याकडे झुकतो आहे. एकदा उमलून , फुलून सर्वस्व अर्पण केलेल्या आणि परिस्थितीनं अकाली कोमेजलेल्या या फुलाला प्रश्न पडला आहे, आता पुन्हा फुलण्याची संधी आहे मात्र ते 'फुलणं' या फुलाला सोसवेल का ? कारण आता वय बदललेलं आहे. आयुष्याच्या सांजवेळेकडे आपण झुकत चाललेलो आहोत, मग आता फुलावं का ? कदाचित त्याचा सद्सदविवेक हे फुलणं नाकारतो. आणि बिनदिक्तपणे तो आपल्या प्रेयसीला सांगतो -

नीत् नवी मरणें मराया जन्म तूं मागू नको.

पण मला वाटतं, परिस्थितीने हताश झालेल्या, व्यवस्थेने होरपळलेल्या,या समाजात राहून वाढणाऱ्या, स्वतःला घडवणाऱ्या माणसानं मुळातच 'प्रेम' ही माणसाला अमर करणारी गोष्ट आहे, प्रेम संजीवक आहे हे विसरू नये, आणि प्रेमाला नाकारू नये. फक्त आवश्यकता असते, ते प्रेम निखळ, निर्मळ आणि नितळ असण्याची ! मग सहजच म्हणता येतं - 

ना उम्र की सीमा हो 

ना देश का हो बंधन 

जब प्यार करे कोई 

तो देखे केवल मन

 असं कोणाला म्हणता येतं? काय हे फक्त गाण्यात आणि चित्रपटातच असू शकतं की वास्तवातही घडू शकतं? वा. रा. कांतांची ही कविता विचारांच्या अशा अनेक दिशा मला देऊन जाते. आणि कदाचित एका अशा उत्तरापर्यंत पोहोचवते, जिथे समाजाची मानसझेप जाणं अत्यावश्यक आहे...

त्या नत्याला नसते नाव 

त्या जीवांना नसतो गाव

तेथ केवळ मधुर भाव !


वृंदा आशय


   

Saturday, 6 September 2025

एक पत्र विसर्जित्या बाप्पास.....

 




प्रिय गणेशा,   

तुझ्या सहवासात १० दिवस किती पटकन गेले रे! आला आला, बसला म्हणेस्तोवर विसर्जनाचीही वेळ आली की! किती काय काय घडलं या १० दिवसात. माझ्यासाठी तर खूप काही....तू येण्याच्या आधीपासूनच असे काही पडघम वाजू लागले की बघता सोय नाही. तुझ्याशिवाय थाराच राहिला नाही रे मला. कधीही न बोलणारी मी अनेकांशी बोलले. ‘दुर्लक्ष करा’ याशिवाय दुसरे उत्तरच नव्हते कोणाकडे. जिथे अधिक लक्ष द्यायला पाहिजे, तिथे दुर्लक्ष! हे माझ्या गणितात बसणारे नव्हते... आणि कदाचित तुझ्याही....म्हणून तू माझ्या कवितेतून सांगत आलास -

अवमानिली जाता माता

कृद्ध  होतो बुद्धिदाता

म्हणे .....

कृष्ण रुपात प्रकटेल आता !

तू माझ्यासाठी धावून आलास, कृद्ध होऊन घेतलंस कृष्णरूप आणि सिद्ध केलंस आजही जागृत आहेस म्हणून! आजही द्रौपदीचं वस्त्रहरण होताना लज्जारक्षण करणारा तूच, याची ग्वाही तू दिलीस. काळाला तू तुझा रारा पुन्हा एकदा दाखवून दिलास. तुला प्रार्थना एकच आहे; आलास कृष्णरुपात जाऊ मात्र कृष्णासारखा नकोस. स्वकुळात यादवी माजू देऊ नको. तुला प्रार्थना आहे, तू विसर्जन कर माणसाच्या अहंकाराचं! खरं म्हणजे तू इतका शस्त्रसज्ज आलेला होतास की माणसाच्या अहंकाराला नेस्तनाबूत करून त्याला धडा शिकवण, तुला कधीच अशक्य नव्हत आणि नाही. मात्र तू देव आहेस आणि म्हणून देवानं माणसासारखं वागू नये. देवानं सूड उगवू नये. देवानं फक्त धडा द्यावा माणसाला धड राहता यावं यासाठी!  

देवा, म्हणूनतुला प्रार्थना आहे तू विसर्जन कर साहित्य, संगीत, शिक्षण या क्षेत्रातल्या माणसांच्या अहंकाराचं! सामान्य माणसाचा प्रश्न नाही रे. त्याची विलक्षण श्रद्धा असते तुझ्यावर. आजही तुला दंडवत घालत, तुला नवस बोलत, तुझ्याकडे तो धावत येत असतो. सातत्याने प्रश्न निर्माण होतो तो फक्त बुद्धिजीवीचा!

सांग त्या बुद्धिजीवीना एका महाबुद्धिजीवीने - लोकमान्य टिळकांनी तुझी प्रस्थापना केली, शिवजयंती आणि गणेशोत्सवासारखे सार्वजनिक उत्सव निर्माण केले तेच मुळी संघटनासाठी. हे संघटनाचे सूत्र लक्षात ठेवून विघटन टाळावयाला शिकव लोकांना. सांग त्यांना त्यांची स्पर्धा स्वतःशी, सभोवतालाशी नाही रे. फार मोठी स्पर्धा आहे इथे आज. कठीण आव्हाने आहेत. माणुसकी पणाला लागलेली आहे. पणाला लागलेली माणुसकी सांभाळणं हे शिक्षण, साहित्य, संगीत या क्षेत्रात वावरणाऱ्या साऱ्यांचे काम आहे. आद्य कर्तव्य आहे. ईश्वरा, त्या कर्तव्याची जाणीव त्यांना करून दे. कधी वाटतं तू यांना आठवण दे तुम्ही एका कुटुंबातले आहात. पण आज दुर्दैवाने कुटुंबातच इतके मतभेद निर्माण व्हायला लागले की कुटुंब ही संज्ञा प्रतीकासारखी, प्रतिमेसारखी वापरावी की नाही हा प्रश्न पडावा! ‘मतभेद’ आणि ‘मनभेद’ हे समानार्थी शब्द झालेत रे! हे परमेशा, नको करूस असं. या कुटुंबाला तू सुरक्षित ठेव. कारण तुझा देव्हारा त्या कुटुंबात आहे. तो देव्हारा सुरक्षित राहिला पाहिजे. भारतीय संस्कृतीचा मंत्र आहे आत्मविसर्जनाचा. हे आत्मविसर्जन अहंकाराच्या बाबतीत असलंच पाहिजे. स्वाभिमान जरूर जोपासावा पण तो माणसे, नाती तोडण्याइतक्या टोकाला जेव्हा जातो ना त्या वेळेला तो घातकच असतो.

हे बुधिदात्या तुझ्या विसर्जनासर्जन आहे. तुझ्या निरोपारोप आहे. तुला प्रार्थना करते जाता जाता तू सर्जन कर सदविचारांचं, तू सर्जन कर एकोप्याचं, तू सर्जन कर नव्यानं शिकण्याचं, तू सर्जन कर कुतूहलाच! हे परमेशा तुला प्रार्थना करते तू रोप लाव नाविन्याचे, तू रोप लाव अनुकूलतेचे, तू रोप लाव युवांच्या नव्या दिशांचं! हे परमेशा, तू आशीष दे! तू आशिष देतच असतोस. काय सांगू तुला, कलियुग आहे रे हे! कधी कधी संस्था एखाद्या व्यक्तीसारखी  वागायला लागते. राग-लोभात, मद-मोहात अडकते. दूषित बुद्धीने आणि कलुषित मनाने निर्णय घेतले जातात आणि मग तू निवडतोस अशा व्यक्तीच्या हातून उद्घाटित हो, अशा व्यक्तीच्या हातून प्रकाशित होणं, ज्यानं आयुष्यभर एखाद्या संस्थेसारखं काम केलेले आहे, तुला सलाम!

कधी नव्हे तो आज नंदादीप पहाटे विझलेला होता रे! काय, तुला सांगायचं होतं का, आता मी जातोय, माऊली यायला वेळ आहे अजून. थोडा काळ तरी तुमचं तुम्ही सांभाळा आणि त्यासाठी पूर्वजांना शरण जात त्यांचे अनुभव विचारा! कदाचित हाच तुझा संदेश असेल.. कदाचित...!

 

वृंदा आशय

अश्वत्थाची सळसळ !

  वर विठ्ठल खाली कृष्ण; जे सोडवतील माझा कूटप्रश्न !         ‌‌.                 •|ॐ |•                       अश्वत्थाची सळसळ  माझं बालपण गेल...