वर्णो वर्णेन वर्ण्यते वर्णज्ञो वर्णतत्त्ववित्।
वर्णे जगदिदं भाति वर्णो ज्ञानप्रकाशकः॥
एक वर्ण (अक्षर) के द्वारा दूसरे वर्ण का वर्णन किया जाता है। जो वर्णों के ज्ञाता हैं, वे ही वास्तव में तत्त्व (सत्य) को जानने वाले हैं। यह सम्पूर्ण संसार वर्णों (शब्दों/अक्षरों) में ही प्रकाशित होता है, क्योंकि वर्ण ही ज्ञान का प्रकाश फैलाने वाले हैं।
•| ॐ |•
थेंब अमृताचे
२. शिवशक्ती ऐक्य
पहिल्या लेखामध्ये आपण ‘सार्थ अमृतानुभवा’तील जे संस्कृत
श्लोक पंचक आहे त्यातील पहिले दोन श्लोक समजावून घेतले. श्रीगुरूंच्या कृपेने
ब्रह्मविद्या संपादन करून सर्वांनी आपले परमहित करून घ्यावे असा एक संदेश कालच्या
श्लोकांनी आपल्याला दिला.
आज त्या पुढच्या तीन श्लोकांचा आपण विचार करणार
आहोत. या श्लोकांमधून 'शिव' आणि 'शक्ती' यांचं ऐक्य सांगितलेलं
आहे. अज्ञानी जीवाला शिव आणि शक्ती यांच्यामध्ये भेद जाणवतो, परंतु परमार्थाच्या
दृष्टिकोनातून त्याचा विचार केला तर शिव आणि शक्ती हे एकच आहेत ते इतके एकरूप आहेत
की कोण कोणाशी संलग्न झालेले आहे हे त्यांच्या समरूपत्वामुळे कळू देखील शकत नाही.
हे ऐक्य पटवण्यासाठी संत ज्ञानदेवांनी विविध दृष्टांत दिलेले आहेत. त्यातील एक
दृष्टांत अगदी आपल्या दैनंदिन जीवनातील आहे. आपण आरशामध्ये आपला चेहरा पाहतो आणि ‘स्व-सौंदर्या’ने आपण आनंदित
होतो. संत ज्ञानदेव म्हणतात यात, "बिंब व प्रतिबिंब यामध्ये भेद दिसला तरी तो वास्तविक सत्य
नसून भास मात्र आहे. ती दोन्ही रूपे मूळच्या चेहऱ्याचीच असल्यामुळे मूळच्या
चेहऱ्याशिवाय वेगळे असे काही तिथे नसते." माऊलींचा हा सोपा दृष्टांत आपल्याला
मूळ चैतन्यतत्त्वाची एकता सहजतेने स्पष्ट करून सांगतो. लहान मुलांपासून म्हाताऱ्या
माणसापर्यंत कोणीही सहजतेने या दृष्टांताचा अनुभव देखील घेऊ शकतो.
सार्धं केन च कस्यार्धं
शिवयोः समरूपिणोः।
ज्ञातुं न शक्यते
लग्नमिति द्वैतच्छलान्मुहुः ॥३॥
या
श्लोकाचे विश्लेषण करताना किसन महाराज साखरे लिहितात,
“सदाच एकरूप असणाऱ्या शिवशक्ती किंवा ‘शिव’ आणि ‘शिवा’ संयुक्त
रूपामध्ये कोणाच्याद्वारे शिवशक्तीचे अर्ध अर्ध भाग संलग्न होतात आणि कोण कोणाचा
अर्धा भाग होतो, त्यांना एकरूप
मानावे का प्रतीतीप्रमाणे दोन मानावेत हे वारंवार विचार करूनही समजणे शक्य होत
नाही. कारण त्यांचे समरूपाच्या ठायी दोन असल्याचा भास होत आहे . (अर्धनारी नटेश्वर
स्वरूप हे असे संयुक्त स्वरूप असते.)
"ब्रह्मवस्तू ही
एकमेवाद्वितीय आहे. ती सशक्तिकही अनादीपणानेच आहे. ब्रह्मवस्तू व तिची शक्ती यात
मुळीच भेद नाही. अद्वय ब्रह्मस्थितीत नेतृत्व, कर्तृत्व व भोक्तृत्व इत्यादी काहीही संभवत नाही.
बहुभवनाच्या स्फुरणरूप इच्छेने ही ब्रह्मवस्तू शक्ती किंचित काहीशी पृथक
झाल्यासारखी होते. तेव्हाच तिला 'शक्ती' ही संज्ञा प्राप्त होते व तत्सापेक्ष ब्रह्मास 'शिव' ही संज्ञा प्राप्त होते.
या शक्तीलाच 'माया' नाव दिले म्हणजे ब्रह्मास
'ईश्वर' आणि या शुद्ध
सत्त्वप्रधान शक्तीला 'प्रकृती' नाव दिले तर ब्रह्मास
तत्सापेक्षतेने 'पुरुष' हे नाव प्राप्त होते.
ईश्वर - माया, पुरुष - प्रकृती, शिव - शक्ती ही दोन तत्वतः
कधीही भिन्न होत नाही सदा एकरूपच असतात. त्यांच्यातील संबंध हा कल्पित तादात्म्य संबंध
आहे त्यामुळे वस्तूतः त्यांच्यात अद्वैत असूनही जगाची निर्मिती झाल्यावर
त्यात द्वैताचा भास होतो या द्वैताभासामुळे शिव आणि शक्ती यांचे अद्वैतरूप लग्न, अभेदरूप तादात्म्य कळत
नाही. शिव हा स्वतःच्या अस्तित्वात संशयविरहित असा स्वयंप्रकाश आहे, आनंदरूप आहे तर शक्ती ही
त्याच्या प्रकाशाने शुद्ध सत्वगुण प्राधान्याने प्रकाशमान होते. शक्ती ही स्वतः
सत्ता-स्फूर्ती-शून्य जड आहे. सच्चिदानंदाला परब्रह्मरूप शिवाला 'एकोSहम् बहुस्यां प्रजायेय' म्हणजे 'मी एक असलेला अनेक
रूपांनी व्हावे' असे 'स्फुरण' झाले तेच 'शक्तिस्वरूप' आहे. ही शक्ती
परब्रह्मरूप शिवाहून किंचितही भिन्न नाही. आपल्याच 'स्फूरणरूप इच्छे'च्या सहाय्याने शक्तिरूपाने तो भासमान भेदरूप
दिसतो. तरीही तो भेद त्यांच्या ठिकाणी वास्तविक नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या
एकत्र येण्याने निर्माण होणारे जगही भासमानच आहे. शिव - शक्ति अशा भासमात्र मिषाने
एक परमात्म तत्त्वच विलसत आहे, हे सिद्ध होते.”
अद्वैतमात्मनस्तत्त्वम्
दर्शयन्तौ मिथस्तराम्।
तौवंदे जगतामाद्यौ
तयोस्तत्त्वाभिपत्तये ॥४॥
या वरील चौथ्या श्लोकामध्ये 'शिवशक्ती'चे अद्वैततत्त्वरूप 'द्वैत लीलेचे' तत्त्व किंवा तात्त्विक स्वरूप
समजण्यासाठी श्री ज्ञानदेवांनी त्यांनाच वंदन केलेले आहे. शक्ती ही कल्पित म्हणजे
अधिष्ठानभूत शिवाहून स्वतंत्र सत्तारहित असल्यामुळे ती शिवाधिष्ठानाविना
स्वतंत्रतेने कार्यप्रवण होऊ शकत नाही. अधिष्ठानरूप, 'संवित' स्वरूप शिवाचेच आश्रयावर शक्तीचे स्फुरण होत असल्यामुळे
तत्त्वत: ती शिवरूपच आहे. ती 'स्फुरण' रूपाने अभिव्यक्त होण्यापूर्वी अव्यक्त रूपाने शिवाचे ठायी
शिवरूपच असते. शक्तीची अभिव्यक्ती ही शिवाची 'लीला' आहे,
करमणुकीचा खेळ
आहे. या क्रीडेचे लीला कैवल्य सोडण्याचा कंटाळा आला की तो शक्तीला आपल्या ठायी
विलीन करतो. स्फुरणात जगाची उत्पत्ती, प्रतीती होते तर स्फुरणलयाबरोबर जगत् -प्रलय होतो, हीच त्या शिवाची
स्वभावसहज क्रीडा आहे.
द्वैत लिलेच्या आवडीने शिवशक्ती परस्परांना प्रगट करतात पण दिसायला जरी दोन
दिसले तरीही ती एकमेकांमध्ये इतकी मिसळून राहतात की सहज कौतुकाने देखील ती दोघे
आपले एकपण मोडू देत नाहीत आपल्या परस्परांच्या एकत्वाचा वियोग घडू नये, आपले समावेशन
बिघडू नये म्हणून शक्तीने विश्वाएवढ्या बालकाला जन्म देऊनही, विश्व निर्माण करूनही तिसरेपणाचा स्पर्शही होऊ दिला नाही. एकाच अद्वैत
परब्रहम सत्तेवर दोघेही अधिष्ठित झाली आहेत. दिव्याचा सारा प्रकाश हस्तगत करण्याचा प्रयत्न
केल्यावर जसा दिवाच हाती येतो त्याप्रमाणे या विश्वरूपाने वाढ विस्तारास पावलेली शक्ती ती समग्र हाती घेतल्यानंतर शिवच
हाती लागतो. अशी शिवशक्ती ही आपले अद्वैत स्वरूप दाखवितात. ही शिवशक्ती
जगताचे आद्यकारण होय. विश्वाच्या प्रतीतीच्या संगतीसाठी ‘शिव’ आणि ‘शक्ती’ ही दोन तत्त्वे मानवी लागतात. अशी ही दोन तत्त्वे मानून मी
त्यांना वंदन करतो, असा भाव संत श्री. ज्ञानेश्वर महाराज या श्लोकातून व्यक्त
करतात.
( किसन महाराज साखरे यांनी संपूर्ण विवेचनामध्ये 'शिव' आणि 'शिवा' असे शब्दप्रयोग अनुक्रमे 'शिव' आणि 'शक्ती' यांच्यासाठी केलेले
दिसतात. त्यासाठी त्यांनी संस्कृत शब्दांचा व्याकरणिक आधार देखील स्पष्ट केलेला
आहे. मराठी भाषेमध्ये मात्र 'शिव'
या शब्दाचे
सामान्य रूप करताना 'शिवा' हा शब्द तयार होतो आणि मग
आकलनामध्ये त्रुटी राहू नये म्हणून मी 'शिवा' या शब्दाचा वापर न करता 'शक्ती' याच शब्दाचा वापर केलेला आहे.
मात्र या निमित्ताने 'शिव'चे सामान्य रूप 'शिवा' आणि 'शिवा' म्हणजे 'शक्ती' यांची जी संगती लागते ती
- शिव जेव्हा सामान्यांच्या रूपाने विलसत जातो तेव्हाच तो शक्तिरूप राहतो, ही संगती केवळ विलक्षण
आणि आनंददायक आहे. भगवान शंकर 'शिव'
असून पार्वती हीच
'शिवा' आहे. श्रीगुरु हे शिवस्वरूप आहेत तर
ब्रह्मविद्या हीच 'शिवा' आहे. विवेकाने अंतःकरण
विशिष्ट जीवस्वरूप शिवाचे मूळ आद्य विशुद्ध शिवाशी ऐक्य जाणावे.)
'शिव'
आणि 'शक्ती' यांना सगुण स्वरूपात वंदन
करण्याने त्यांचा कृपाप्रसाद होऊन अंत:करण शुद्धी होऊन जिज्ञासापूर्वक 'साक्षात शांकरी विद्या' प्राप्त होते आणि
शिवशक्तीचे अभेद रूप तादात्म्य अचूकपणे समजते, म्हणून मी त्या दोघांना वंदन करतो असा संत ज्ञानदेवांच्या
मनीचा भाव इथे व्यक्त होतो.
या वंदनाचा पारमार्थिक सखोल अर्थ स्पष्ट करताना
किसन महाराज साखरे लिहितात,
" येथे वंदन करणे म्हणजे केवळ नमस्कार करणे असा
सीमित अर्थ अपेक्षित नाही. तर पंचकोशात्मक उपाधीचा निरास करून अहम् भावाचा
परित्याग करून 'शिवशक्ती समावेश
नमन केले' म्हणजे शिवशक्तीशी
अभेदरूपाने समाविष्ट होऊन एक होऊन, त्यांना
आत्मत्त्वाने जाणणे, नित्य निरतिशय, स्वानंद सौख्यस्वरूप
सदाचेच होऊन असणे हेच अद्वैतात पर्यवसित होणारे खरे वंदन होय. या अशा वंदनाने
शिवशक्तीच्या तत्त्वाची अद्वैततत्त्वाची अभिपत्ती होते किंवा आपल्या अंतःकरणाच्या
इंद्रियांच्या सर्वच्या सर्व वृत्ती परमेश्वरास सदाच्या समर्पित करून केवळ
परमेश्वरैक शरण होणे, त्यामुळे त्याची
कृपा होऊन, त्याच्या यथार्थ
स्वरूपाचे ज्ञान होते. यालाच श्री ज्ञानराज माऊलींनी 'तत्त्वाभिपत्ति' म्हणले आहे व त्यासाठीच
वंदन केले आहे."
आत्ता इथे थांबूयात. लेखाच्या विस्तार भयास्तव
पाचव्या श्लोकाचे विवेचन स्वतंत्र लेखात करूया.
संपूर्ण समर्पण!
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!
संदर्भ ग्रंथ
१. सार्थ अमृतानुभव - संपादक किसन महाराज साखरे

No comments:
Post a Comment